अक्षीच्या दैवतांच्या गोष्टी

इतिहासाच्या सान्निध्यात घालवलेली एक संघ्याकाळ

आज मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे. एक आहे देवांची आणि दुसरी दानवांची. हे दोघेदेव-दानव राहतात एकाच गावात, अक्षी त्याचे नाव. पण ते गुण्यागोविंदाने राहत असतील की आणि कसे राहत असतील ते तुम्हीच ठरवा.

कोरोना काळात फारसे भ्रमण शक्य झाले नसल्यामुळे डिसेंबरची अल्हाददायक सुट्टी निरर्थक वाया गेली. आला मार्च महिना, मुलगा ओम याला सुट्टी मिळाली, पत्नी शीतलनेही वार्षिक सुट्ट्या संपवण्यासाठी सुट्टी घेतली आणि आमची अलिबाग मधील अक्षी बीच वर ट्रिप नक्की झाली.

१९ मार्च २०२१ला सकाळी आम्ही (मी, शीतल, ओम, शीतलची बहीण सुप्रिया आणि तिचे पती निलेश) असे पाच जण अक्षी येथील हॉटेल सी ब्लिस (आधीचे हॉटेल सूर्यकिरण) मध्ये जेवणाच्या वेळेस पोहोचलो. त्यांच्या सुंदर, स्वच्छ, रंगवलेल्या नारळाच्या आणि सुपारीच्या माडीमध्ये चविष्ट जेवण झाले, दुपारी तासभर झोप झाली आणि संध्याकाळी अक्षी बीचवर सोनेरी सूर्यास्ताचा आनंद लुटत समुद्रात डुंबूनही झाले. दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २० मार्च २०२१ पांडवकालीन कनकेश्वर देवळात ६५० पायऱ्या चढून शंकराचे दर्शन घेऊन आलो आणि संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अक्षी गावाच्या दर्शनास बाहेर पडलो. राणी म्हणजेच सुप्रिया कनकेश्वर चढाई करून पूर्ती दमली असल्यामुळे मी, शीतल, निलेश आणि ओम अशी चौकडी अक्षी दर्शनास निघाली.

हॉटेलवर येता जाता आम्ही वाटेत बरीच सुंदर देऊळे बघण्याचे हेरून ठेवली होती. ती आता निवांतपणे पालथी घालायचा बेत ठरला आणि आम्ही दोन पायांवर मार्गस्थ झालो.


गणेश भेट
आम्ही राहत असलेल्या खोलीच्या गच्चीतून एक सुंदर कळस नेहमी दिसत असत. तो होता दोन घरे सोडून असलेल्या गणपती देवळाचा कळस. आम्ही काही पाउलातच पहिल्या देवळात पोचलो.


सुंदर, सुबक मूर्ती आणि स्वच्छ देऊळ बघून मन प्रसन्न झाले. देवळात दोन्ही बाजूच्या भिंतींकडे ट्रॉफीची रांग लागलेली होती. कोणत्या न कोणत्या क्रिकेट स्पर्धेत दुसरे बक्षीस, पहिले बक्षीस, उत्तेजनार्थ बक्षीस वगैरे वगैरे, ही मोठी रांग. बाप्पाचे आणि ट्रॉफींचे दर्शन घेऊन बाहेर आलो तर समोर ४-५ गावातली पोरे बसून गप्पा-टप्पा मारत बसलेली दिसली. या अक्षीच्या उनाड पोरांबद्दल लवकरच भन्नाट गोष्टी मला समजणार होत्या. तुम्हालाही समजतील, जरा धीर धरा.

  

जय जय विठ्ठल रखुमाई
गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही नसलेल्या रस्त्यावर (रस्त्याच्या नावाखाली  दगड, माती आणि उखडलेले डांबर) आम्ही चालू लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जुने बांधकाम असलेली, आणि अजूनही तशीच ठेवलेली घरे नजरेस पडू लागली. समोर लाल मातीत वसलेली माडी, एका रांगेत उभी सुपारीची झाडे, आणि मागे अक्षीमधले लाकडी किंवा कौलारू एक घर असे एकूण अक्षी गाव दिसले. चालत असताना मध्येच शीतल ओरडली, "अर्रे हे बघा, इथे एक देऊळ आहे."

समोर एक अत्यंत जीर्ण झालेला, लाकडी बांधकाम असलेला कौलारू वाडा किंवा घर उभे होते. बाहेर एक छोटी पाटी लावलेली, 'विठ्ठल रखुमाई मंदिर'


दाराला कडी होती, पण आधीच्या भटकंती मधून समजले होते की अशा देवळात आपणच कडी काढायची असते आणि देऊळ बघायचे असते, कारण ही वैयक्तिक मालकीची देऊळे असतात आणि इथे इतर देऊळांसारखी सतत वर्दळ नसते.

कडी काढून आत गेलो तर गाभाऱ्यात दोन प्राचीन अशा विठ्ठल आणि रखुमाईच्या दगडी मूर्ती स्थापित दिसल्या. त्यांना वस्त्रे नेसवलेली असल्यामुळे त्यांचे पूर्ण मोहक रूप झाकले गेले होते, पण चेहेराच एवढा सुरेख कोरला होता की लगेच कळावे की ही विठ्ठल-रखुमाईच्या जोडी आहे. 


गाभाऱ्याच्या बाजूने वरती एक लाकडी जिना दिसला आणि वर लाकडी माडी आणि त्याच्यावरती झरोक्याचे छप्पर. वारंवार ती माडी मला वर यायला खुणावत होती आणि जिना चढून वर जायची इच्छाही झाली, पण एकूण वाड्याची परिस्थिती पाहता तो अंधारी लाकडी जिना चढण्याचे धाडस झाले नाही.



एवढ्या जीर्ण वाड्यात नित्यनियमाने स्वच्छता ठेवून, गाभाऱ्यात विठ्ठल-रखुमाई स्थापन करून त्यांची देखभाल कोणीतरी करत होतं. त्यातून उत्पन्न मिळावे असं म्हणावं तर तसं तरी नक्कीच नाही, कारण ऐच्छिक दानपेटी सुद्धा नव्हती. भक्तीपोटीच सेवा चालली होती हेच खरं.


जोशी बुवांचे लक्ष्मी-नारायण
परत देउ ळाच्या दाराला कडी लावून आम्ही पुढच्या देवळाकडे चालू लागलो. वाटेत प्रशस्त आंगण असलेली कौलारू घरे बघून हेवा वाटायचा पण दुरून डोंगर साजरे की काय असेही वाटायचे. थोडं पुढे गेल्यावर डावीकडे एक देऊळ लक्ष वेधून घेतं. नाही म्हटलं तरी ते डोळ्यात न भरता कोणी पुढे जाऊच शकत नाही. वेगळ्याच प्रकारे टाईल्स लावल्यामुळे प्रथमदर्शनी ते एखाद्या जपानी देऊळासारखे भासले. पण वर कौलारू छप्पर आणि त्यावर नाव 'लक्ष्मी नारायण मंदिर'. या देवळाचा दरवाजा ही वेगळाच, फायबरचा पारदर्शक. दरवाजा उघडून आत गेलो तर आत गाभाऱ्यात पांढऱ्या शुभ्र मूर्त्या डोळ्यात भरतात.



मध्यभागी लक्ष्मी नारायण, उजव्या बाजूला गणपती बाप्पा आणि डाव्या बाजूला विष्णू कोणावर तरी आरूढ आहेत अशी मूर्ती होती. मी आणि शीतल विचार करत होतो की हे कोण असावेत. मला वाटलं की कुबेर आहे, पण कुबेर आणि विष्णू यांचा काही संबंध लागेना. तेवढ्यात छोट्या ओमने आम्हा सर्वांना चकित केले. त्याने अंदाज नाही तर ठोसपणे सांगितले की विष्णू हे गरुडावर बसले आहेत, "मला कसं कळालं सांगू, त्यांची नखं बघ!"


तेवढ्यात एक माणूस देउळला लागूनच असलेल्या घरातून आणखी एका माणसाला घेऊन आला. ते म्हणजे जोशी, जे बोलत राहिले आणि आम्हाला देऊळाबद्दल पूर्ण माहिती दिली. कसं त्यांनी मुंबईतल्या प्रसिद्ध मूर्तिकाराकडून या मूर्त्यांना लेप देऊन आणला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे या देवांची रचना मुळात अशी नव्हती, वेगळी होती. गणपती बाप्पा मध्ये विराजमान होते, उजवीकडे लक्ष्मी-नारायण जोडी आणि दुसरी विष्णूंची मूर्ती डावीकडे. पण उंचीप्रमाणे ती रचना जरा डोळ्यात बोचत होती म्हणून ही नवीन रचना करण्यात आली.

आधी

                                                    

आता

मी त्यांना विचारले की हे विष्णू कोणावर स्वार आहेत? तर त्यांनी लगेच उत्तर दिले, गरुडावर! म्हणजे ओमने केलेला अंदाज, तंतोतंत खरा निघाला होता. जे आम्हाला कळले नाही ते छोट्या ओमच्या चटकन लक्षात आले होते.

जोशी वारंवार सांगत होते की लोकांनी खूप मदत केली म्हणून हे देऊळ शक्य झाले, "अहो विश्वास बसणार नाही, पण लोकांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून पैसे दिलेत. अगदी ५ हजार ते पन्नास हजार. मी तर प्रेमाने बोलून देण्याला भाग पाडायचो. एका मित्राला फोन केला आणि म्हणालो ५० हजार रुपये दे, आणि त्याला पटवून दिले. आले ५० हजार रुपये. शेवटी तो माझ्याकडून करवून घेत होता, नाही तर मी कोण हे सगळं करणारा." 

गाभाऱ्याच्या बाहेर एक नंदी होता. जोशी नंदीजवळ गेले आणि म्हणाले, "शंकराचे दर्शन कसे घ्यायचे माहीत आहे का?" असं म्हणून त्यांनी डाव्या हाताची दोन बोटे (अंगठा आणि तर्जनी) नंदीच्या दोन शिंगांवर ठेवली आणि उजवा हात नंदीच्या शेपटीवर ठेवला. खाली वाकून त्यांनी शिंगांवर ठेवलेल्या दोन बोटांच्या मधून पलीकडे बघितले की समोर शंकराचे पिंड दिसते. ही प्रथा किंवा पद्धत आम्हाला आता, या क्षणी ज्ञात झाली होती, तर जोशींनी जेव्हा या मूर्ती परत स्थापित केल्या तेव्हा आलेल्या गुरुजींकडून ही पद्धत कळाली.

असे बराच वेळ बोलत बोलत आम्ही शेवटी एस. टी. महामंडळातून निवृत्त झालेल्या जोशींचा निरोप घेतला. आणखी पुढे जायचे होते, आणखी अक्षी बघायचे होते.

 

कुत्रे आमचे मित्र
रस्त्यावरून चालू लागलो आणि समोरून एक कुत्री शेपटी हलवत अशी आमच्याकडे आली, जशी काही आमची जुनी पुराणी ओळखच आहे. कुत्र्याला बघून ओम घाबरला आणि काकांच्या मागे लपू लागला. तेवढ्यात अजून एक कुत्री असंच शेपटी हलवत आली आणि ओम पुरता टरकला. अजून पुढे गेलो तर तिसरे कुत्रे आले आणि तिघांनी शेपटी हलवत आम्हाला अक्षरशः घेरले. ओम आता पुरता घाबरला होता, म्हणून आम्ही उजवीकडे असलेल्या आणखी एका सुंदर देवळाच्या दारातून आत गेलो. तर तीनही कुत्री आमच्या मागे आत! तसंच आम्ही देऊळाचे दार उघडले आणि आत शिरलो. नशिबाने ती कुत्री देवळात नाही आली आणि ओमची तेवढ्यापुरती तरी सुटका झाली.



 
उजव्या सोंडेचे गणपती
गाभाऱ्यात पांढऱ्या टाईल्स मध्ये एक सुबकशी संगमरवरी गणपतीची मूर्ती होती. सवयीप्रमाणे निलेशने भराभर गाभाऱ्याचे आणि मूर्तीचे फोटो काढले. आणि मग त्यांचे लक्ष गेले मूर्तीकडे. "अर्रे ही उजव्या सोंडेची गणपती मूर्ती आहे!", आश्चर्ययुक्त भीतीने भरलेल्या स्वरात त्यांनी मूर्तीचे अस्तित्व नोंदविले. आणि पुढच्याच क्षणी, "उजव्या सोंडेच्या गणपतीचे सोवळे खूप कडक असते. याचे फोटो ही काढायचे नसतात", हा साक्षात्कार झाला आणि जेवढ्या भराभर त्यांनी फोटो काढले होते तेवढ्याच किंवा त्याहून भराभर त्यांनी या गणपतीचे सगळे फोटो मोबाईल मधून डिलिट केले. या प्रतिक्रियेमुळे ओमच्या चिमुकल्या मनावरही हे ठसले गेले की उजव्या सोंडेच्या गणपतीचे फोटो काढायचे नाहीत. काढलेले चांगले नाही, म्हणजेच काहीतरी वाईट होते. आता त्याची विचारशक्ती जेव्हा जागृत होईल तेव्हा काय मानायचे आणि काय नाही हे तोच ठरवेल.


मी असे काही मानत नाही, म्हणून हा फोटो

तेवढ्यात माझे लक्ष कोपऱ्यात असलेल्या लाईट बोर्ड कडे गेले. त्यावर एक गोलाकार
, कुठेही न दिसणारा असा फॅनचा रेग्युलेटर विराजमान होता. त्याचा गोल आकार, घड्यातल्या आकड्यांसारखे लिहिलेले आकडे आणि पांढऱ्याचा झालेला पिवळा रंग बघून सहज काळात होते की हे काही साधे सुधे रेग्युलेटर नाही. बाजूच्या भिंतींकडे बघितले तर खिडक्या ही लाकडी, त्यांचे दरवाजेही लाकडी आणि खिडक्यांचे गजही लाकडीच, आणि ते ही जुन्या काळातले लाकूड. म्हणजे हा ही प्राचीन वाडाच होता तर.



प्रदक्षिणा मारायला डावीकडून सुरुवात केली आणि मागच्या बाजूला गेलो तर मागे एक विलक्षण पाण्याची टाकी दिसली. दोन लोखंडी नक्षी केलेल्या खांबांवर एक सिमेंटची टाकी तग धरून बसली होती. ती इतकी वर्षे या लोखंडी खांबांवर तोल सांभाळत बसली होती की ते लोखंडी खांब सिमेंट मध्ये चक्क रुतले गेले होते.


एक क्षण असा भास झाला की आपण शंभर सव्वाशे वर्ष मागच्या काळात तर वावरत नाही आहोत! सुदैवाने किंवा दुर्दैवाने दुसऱ्याच क्षणी वर्तमान काळात आलो आणि लक्षात आले की प्रदक्षिणेचा मार्ग पुढे मध्येच बंद होतो. आल्या वाटेने परत सभामंडपात आलो आणि मुकाट्याने गणपती बाप्पांचा निरोप घेत बाहेर पडलो. बाहेर तीन कुत्री हजरच! शेपट्या हलवत आमच्या मागे परत हजेरी लावली आणि ओम भाऊंच्या नेहमीच्या महिष्मती गर्जनेने पूर्ती मान टाकली.     

 

अक्षीची ग्रामदैवत
शेवटी निलेशने दगड उचलला आणि नुसता भिरकावला आणि ही मात्र कामी आली. कुत्री तात्पुरती का होईना पण पांगली. तसेच चालत पुढे गेलो आणि डावीकडे रस्त्याच्या बाजूला दोन आगळ्या वेगळ्या दीपमाळ डौलाने उभ्या! 


उजवीकडे बघितले तर एक मोठे देऊळ
, आणि त्यावर मोठी पाटी, 'काळंबा देवी  मंदिर'. देऊळ तसे नवीन दिसत होते. चकचकीत आणि भारदस्त झुंबर असलेल्या सभामंडपाने आमचे स्वागत केले. गर्भगृहात काळा ऑइल पेंट मारलेल्या देवीच्या २ मूर्ती होत्या, अर्थात वस्त्र नेसलेले असल्यामुळे पूर्ण रूप दिसले नाही. पण या गोऱ्यागोमट्या देवी नव्हत्या म्हणजे कदाचित प्राचीन असाव्यात.


देवळाच्या बाहेर आलो की उजवीकडे गजलक्ष्मीचे छोटेखाना देऊळ दिसले. दोन हत्तीची सोंड देवीच्या डोक्यावर एवढेच काय ते दिसत होते
, बाकी दगडी मूर्ती काळाच्या ओघात जीर्ण झाली होती हे वस्त्राआडून पण कळत होते.



बघता बघता आमची अक्षी गावातली पाच एकापेक्षा एक निराळी देऊळे बघून झाली. अक्षी मधली जुनी घरे, जुना वसा, अक्षीची वेगळी ओळख लक्षात आली. आणि निलेशने चहाची तल्लफ लागली. अक्षीसारख्या छोट्या गावात चहाची टपरी वगैरे काही नसतं. अलिबाग पोहोचेपर्यंत एखादे हॉटेलही नजरेस पडत नाही असा हा परिसर, मग इथे आता चहा मिळणार कुठून? पण इच्छा तिथे मार्ग या तत्वानुसार निलेशने समोरच असलेल्या शिर्के रिसॉर्ट बाहेर उभे असलेल्या माणसांना विचारून बघितले आणि तिथेच शिर्के रिसॉर्ट मध्येच आमची चहाची सोया झाली.

कुल्हड मध्ये दिलेला चहा पिऊन आम्ही माघारी फिरलो. आता अंधारही पडायला लागला होता. परत येत असताना अचानक लक्ष्मी-नारायण मंदिराचे जोशी वाटेत उभे, "काय, बघितली का आणखी देऊळे? आणि ते काळंबा देवीचे देऊळही बघितले का? ती गावाची कुलदेवी!"

अच्छा तर आम्ही कुलदेवीचे दर्शन घेऊन आलो होतो तर. पुढे जोशींनी हे ही सांगितले की बाहेर असलेली गजलक्ष्मी म्हणजे काळंबा देवीची रक्षणकर्ता, म्हणून ती बाहेर आहे, सदैव रक्षण करायण्यासाठी. ही नवीन गोष्ट मनाच्या कोपऱ्यात साठवत आम्ही जोशींचा निरोप घेतला आणि पुढे आलो तर कुत्री परत हजर. या वेळी मात्र आम्ही प्रत्येक कुत्र्याला टोस्ट दिले आणि तीनही कुत्र्यांनी संतुष्टपणे ते संपवले आणि आपापल्या मार्गी गेले.

अशी होती अक्षी गावातली आमची एक अविस्मरणीय संध्याकाळ. भूतकाळात रमवून ठेवणारी, मन प्रसन्न करणारी, नवीन नवीन गोष्टी आमच्या समोर ठेवणारी, कार्यकुशल माणसांना भेटवणारी आणि प्रेमळ कुत्र्यांची आठवण बरोबर पाठवणारी. 

ही होती अक्षीच्या दैवतांची गोष्ट. अक्षी गावच्या दानवांच्या भन्नाट गोष्टी पुढे वाचूयात... लवकरच!

 
अक्षी गावातील दानवांच्या गोष्टी इथे वाचा
https://bit.ly/3e5t59D

- धवल रामतीर्थकर 

 

Comments

  1. वा सुँदर फोटो आहेत. छान वाटले वाचताना . छोट्या ओमचे विशेष कौतुक

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

व्यंकटेश बाप्पाने केले माझे काम. जय श्री राम!

फासे पारध्यांची गोडी

नवयुगातील हिंदू द्वेषी चाळे... बाप्पाच्या साक्षीने